आमच्या विषयी

' समाज प्रबोधन पत्रिका '

       विवेकनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व लोकशाही ही मूल्यनिष्ठा ठेवून पुणे येथील समाज प्रबोधन संस्था १९५९ पासून ग्रंथप्रकाशन, शिबिरे-परिसंवाद, ग्रामीण समस्यांचे अभ्यास-संशोधन, या मार्गांनी महाराष्ट्रात वैचारिक जागृतीचे कार्य करीत आहे. सद्य:स्थितीतील ज्वलंत प्रचलित समस्यांवर जागरूक मंडळींमध्ये सातत्याने चर्चा चालावी आणि अशा मंडळींची एक बैठक निर्माण व्हावी. या हेतूने समाज प्रबोधन संस्था 'समाज प्रबोधन पत्रिका' प्रकाशित करते. समाज प्रबोधन संस्थेत सर्व विचारांची, वेगवेगळ्या राजकीय पक्षातील मंडळी वैचारिक जागृतीचा एक व्यापक व पायाभूत कार्यक्रम पार पाडण्यासाठी एकत्र आलेली आहेत. ‘समाज प्रबोधन पत्रिका’ समाज प्रबोधन संस्थेने चालविलेली असली तरी ते संस्थेचे अधिकृत मुखपत्र नाही. वर उल्लेखिलेल्या व्यापक निष्ठांच्या चौकटीत राहून 'समाज प्रबोधन पत्रिके' चे कार्य स्वतंत्रपणे चालते. ‘समाज प्रबोधन पत्रिके' तील लेखांत व्यक्त झालेली मते ही ज्या त्या लेखकांची असून संस्था त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.
       समाज प्रबोधन संस्थेने १९६२ पासून 'समाज प्रबोधन पत्रिका' प्रकाशित करावयास सुरुवात केली. प्रा. ग. प्र. प्रधान, प्रा. अ. भि. शहा, प्रा. देवदत्त दाभोळकर व प्रा. मे. पुं. रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रिकेचे काम सुरु झाले. सुरुवातीस श्री. पन्नालाल सुराणा हे पत्रिकेचे संपादक होते. श्री. वसंत पळशीकर यांच्या संपादकत्वाच्या काळात पत्रिकेने आकार घेतला आणि ते महत्त्वाच्या प्रश्नांची साधक बाधक मांडणी करणारे वैचारिक व्यासपीठ बनले. श्री. वसंत पळशीकर यांच्या नंतर डॉ. भा. शं. भणगे आणि डॉ. स. ह. देशपांडे यांनी 'समाज प्रबोधन पत्रिके' ची धुरा सांभाळली. १९८२ ते १९८९ या काळात 'समाज प्रबोधन पत्रिके' चे प्रकाशन बंद होते. १९९० साली डॉ. राजेंद्र व्होरा यांच्या संपादकत्वाखाली पत्रिकेचे पुनरुज्जीवन झाले. त्यानंतर २००४ साली श्री. महेश गावसकर हे संपादक झाले. २०११ पासून डॉ. अशोक चौसाळकर हे पत्रिकेचे संपादक म्हणून काम पाहत आहेत आणि गेली तेरा वर्षे पत्रिकेचे प्रकाशन अव्याहतपणे सुरू आहे.